प्रशांत यादव यांच्या रूपाने सक्षम नेतृत्व पुढे येतंय: रवींद्र चव्हाण

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण येथे झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाची विचारधारा आणि संघटनाची ताकद यावर प्रकाश टाकताना भाजप नेते प्रशांत यादव यांच्या कार्याचे आणि नेतृत्वाचे विशेष कौतुक केले. भाजप नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली अनेक लोक आज पक्षामध्ये दाखल होत आहेत. माझा प्रदेशाध्यक्ष म्हणून चिपळूणमधील हा पहिलाच दौरा असून, येथे मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पक्षाच्या वाढत्या प्रभावाचे द्योतक आहे. प्रशांत यादव यांच्या पत्नी स्वप्ना यादव या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असून, त्यांच्या उत्तम नियोजन कौशल्याचे आज उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. प्रशांत यादव यांचे काम अत्यंत प्रभावी आहे आणि त्यामुळे २०२९च्या निवडणुकीत त्यांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. त्यांच्या रूपाने चांगले नेतृत्व पुढे येणे अत्यावश्यक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

चिपळूण येथील प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात हा जाहीर पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जिल्हा आणि तालुक्यातील भाजपचे अग्रणी नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रशांत यादव, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सतीश मोरे, माजी आमदार सूर्यकांत दळवी, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार डॉक्टर विनय नातू, स्वप्ना यादव, नीलम गोंधळी, स्मिता चव्हाण, ॲड. नयना पवार, माजी सभापती स्नेहा मेस्त्री, आरती धामणस्कर, नुपूर बाचीम, अमोल बोभस्कर, तालुकाध्यक्ष विनोद भुरण, शहराध्यक्ष शशिकांत मोदी, महिला शहराध्यक्षा रसिका देवळेकर, उदय घाग, प्रणाली सावर्डेकर, राजू भाटलेकर, निलेश सुर्वे, वैशाली निमकर, सुनील वाजे, आशिष खातू आणि परिमल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी आपल्या प्रभावी भाषणात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि नंतर स्वतः, हीच भाजपची भूमिका आहे. २०२४ पासून देशाची दिशा संपूर्ण जगभर उंचावली आहे. देशहित जपण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपला पक्ष अहोरात्र कार्यरत आहे. पूर्वी राजीव गांधी यांनी सांगितले होते की केंद्राकडून आलेला एक रुपया लाभार्थ्यांपर्यंत फक्त १५ पैसेच पोहोचतात. परंतु आता काळ बदलला आहे, केंद्र सरकारकडून आलेले १०० टक्के पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचतात. हीच पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची भाजप शैली आहे. चव्हाण पुढे म्हणाले, भाजप हा केवळ सत्तेचा पक्ष नाही, तर राष्ट्रभावनेवर चालणारी संघटनात्मक शक्ती आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने राष्ट्रसेवा हाच धर्म मानून काम केले पाहिजे. आज कार्यकर्त्यांमुळेच पक्ष तळागाळात मजबूत झाल आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत यादव यांनी केले. त्यांनी सांगितले, भाजपमध्ये आल्यापासून आम्हाला सन्मानाची आणि चांगल्या पद्धतीची वागणूक मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘शतप्रतिशत भाजप’ करण्यासाठी सुरुवात केली आहे. पक्षाने आम्हाला ताकद दिली तर आम्ही चिपळूण-संगमेश्वर तालुक्यात शतप्रतिशत भाजप करून दाखवू. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाकडून मिळालेल्या सूचनांनुसार काम करून यश मिळवून देऊ.

या पक्षप्रवेश सोहळ्यात तीनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नवागत कार्यकर्त्यांचे स्वागत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये ॲड. विजय तावडे, तेजस्विनी किंजलकर, सुयोग बेलवलकर, संतोष बेलवलकर, प्रमोद वंजारे, साक्षी काटकर, वैष्णवी सावंत यांच्यासह अनेक तरुण व उत्साही कार्यकर्त्यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमात देशभक्तीचा उत्साह, पक्षाच्या घोषणांचा नाद आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण वातावरण उत्सवमय झाले होते. चिपळूणमधील हा पक्षप्रवेश सोहळा फक्त औपचारिकता नसून भाजपच्या वाढत्या जनाधाराचे आणि प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या नवचैतन्याचे दर्शन घडवणारा ठरला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा नवा संचार झाला असून, आगामी निवडणुकांसाठी भाजपने शक्तिप्रदर्शनाचा ठोस संदेश दिला आहे.

संबंधित लेख