अखेर महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला
- by Yogesh Bandagale
- December 15, 2025
- 122 views
मुंबई : मुंबई-ठाण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यातील 29 महापालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका या गेल्या पाच ते सात वर्षांपासून किंवा त्या पेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यामध्ये सुरुवातीला 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
महापालिकेच्या निवडणुकीचे वेळापत्रक
- नामनिर्देशन पत्र स्वीकारणे - 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
- अर्जाची छाननी - 31 डिसेंबर
- उमेदवारी माघारीची मुदत - 2 जानेवारी
- चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी - 3 जानेवारी
- मतदान - 15 जानेवारी
- निकाल - 16 जानेवारी
राज्यातील 27 महापालिकांची मुदत संपली आहे. त्यासोबत जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या महापालिका निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदान यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आली असल्याने त्यामध्ये नावे वगळण्याचे अधिकार राज्य आयोगाला नाहीत असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
एकूण मतदार - 3.48 कोटी
एकूण मतदार केंद्र - 39,147
मुंबईसाठी मतदार केंद्र - 10,111
कंट्रोल यूनिट - 11,349
बॅलेट यूनिट - 22,000
निवडणूक खर्चाची मर्यादा
महापालिका निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने आखून दिली आहे. त्यामध्ये मुंबईसह अ वर्ग महापालिकांसाठी एका उमेदवाराला 15 लाख रुपये खर्च करण्याची मुभा आहे.
अ वर्ग - 15 लाख
ब वर्ग - 13 लाख
क वर्ग - 11 लाख
ड वर्ग - 9 लाख
मुंबई महापालिकेमध्ये एक सदस्यीय वॉर्ड असल्यामुळे मतदारांना एकच मत द्यावं लागणार आहे. तर उर्वरित 28 महापालिकांसाठी एक ते पाच सदस्यीय वॉर्ड असल्याने त्यानुसार मतदान द्यावं लागणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे. तसेच ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यांना निवडणुकीपासून सहा महिन्यांच्या आत सादर करावं लागणार आहे.
मतदार जनजागृतीसाठी रील तयार करण्यात आले आहेत. जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी मतदार केंद्रावर आवश्यक त्या सुविधा असतील. मतदान केंद्रावर रँप आणि व्हील चेअर असतील.
राज्यातील 1,96, 605 कर्मचारी या निवडणुकीसाठी काम करतील. मतदानाच्या आधी 48 तास प्रचारावर बंदी असेल. तसेच त्या दरम्यान जाहिरातींवरही बंदी असेल. महापालिका निवडणूक नियमांनुसार ही बंदी असेल.
राज्यातील 29 महापालिकांसाठी एकूण 2,869 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामध्ये 1,442 महिला सदस्य, 759 इतर मागासवर्गीय सदस्य, 341 अनुसूचित जाती तर 77 सदस्य हे अनुसूचित जमातीचे सदस्य असतील.
दुबार मतदारांच्या नावासमोर स्टार चिन्ह
मुंबईत 11 लाख संभाव्य दुबार मतदार आहेत. एकूण मतदारांचा विचार करता ती सात टक्के इतकी असल्याचं समोर आलं आहे. या दुबार मतदारांची ओळख केली असून त्यांच्या नावासमोर दोन स्टार असतील. त्यांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलं आहे आणि मतदान कुठे करणार हे त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात आले आहे. ज्यांचा सर्व्हे झाला नाही त्यांच्याकडून मतदान केंद्रावर हमीपत्र घेतल जाईल.
कोणत्या महापालिकांमध्ये निवडणूक होणार?
1. बृहन्मुंबई - 227
2. भिवंडी-निजामपूर - 90
3. नागपूर – 151
4. पुणे – 162
5. ठाणे - 131
6. अहमदनगर - 68
7. नाशिक – 122
8. पिंपरी-चिंचवड - 128
9. औरंगाबाद - 113
10. वसई-विरार - 115
11. कल्याण-डोंबिवली - 122
12. नवी मुंबई - 111
13. अकोला - 80
14. अमरावती - 87
15. लातूर - 70
16. नांदेड-वाघाळा - 81
17. मीरा-भाईंदर - 96
18. उल्हासनगर - 78
19. चंद्रपूर - 66
20. धुळे - 74
21. जळगाव - 75
22. मालेगाव - 84
23. कोल्हापूर - 92
24. सांगली-मिरज-कुपवाड - 78
25. सोलापूर - 113
26. इचलकरंजी – 76
27. जालना - 65
28. पनवेल - 78
29. परभणी – 65
