उद्धव ठाकरेंना विशिष्ट लोकांचे जोडे चाटून मते मिळवायची आहेत: देवेंद्र फडणवीस
- by Yogesh Bandagale
- December 26, 2025
- 60 views
मुंबई : राज्यातील राजकारणात ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांमुळे आधीच वातावरण तापले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीवर अत्यंत कठोर आणि आक्रमक शब्दांत टीका केली आहे. ठाकरे बंधूंना लक्ष्य करत, सध्याचे त्यांचे राजकारण मतांसाठी लांगुलचालनावर आधारित असल्याचा आरोप त्यांनी केला. फडणवीस म्हणाले की, काही विशिष्ट घटकांची मर्जी राखण्यासाठी आणि मतांचे राजकारण साधण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्यातून संबंधित नेत्यांचा विचार, दिशा आणि चारित्र्य स्पष्टपणे जनतेसमोर येत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत, त्यांच्या सुपुत्राकडून घेतल्या जात असलेल्या निर्णयांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये रशिद खान मामू यांना पक्षात प्रवेश देण्यात आल्याचा संदर्भ देत फडणवीस यांनी हा निर्णय केवळ मतांचे लांगुलचालन करण्यासाठी असल्याचा आरोप केला. अशा प्रकारे व्यक्तीविशेषांना पक्षात सामावून घेणे म्हणजे विचारधारेचा त्याग असून, यातून संबंधित नेतृत्वाची वैचारिक घसरण स्पष्टपणे दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
फडणवीस यांनी आणखी आक्रमक शब्दांत सांगितले की, विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आणि त्यातून मते मिळवायची, हा प्रकार महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेसा नाही. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी दाखवली जात असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, अशा राजकारणाला जनता भुलणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देशावर प्रेम करणारे, राष्ट्रनिष्ठ आणि विचारांशी प्रामाणिक असलेले नागरिक हे सर्व बारकाईने पाहत असल्याचे सांगत, या प्रकारच्या राजकारणाची किंमत संबंधितांना मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका करताना फडणवीस यांनी महायुतीबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. महायुतीची घोषणा करण्याची आम्हाला कोणतीही घाई नाही किंवा आवश्यकता नाही, असे ते म्हणाले. आम्ही आधीपासूनच एकत्र आहोत आणि आमच्यात कोणताही संभ्रम नाही, असा दावा त्यांनी केला. विरोधकांकडून होणाऱ्या घोषणा या केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी असल्याचा टोला त्यांनी लगावला. आमच्यातील एकजूट कृतीतून दिसते, घोषणांमधून नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
