कोकणवासीयांसाठी शरद पवारांची रेल्वे मंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी
- by Yogesh Bandagale
- October 07, 2025
- 54 views
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना एक पत्र लिहून कोकणवासीयांसाठी खास मागणी केली आहे. त्यांनी पत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ, कणकवली व सावंतवाडी स्थानकांवर निवडक लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबे देण्याची विनंती केली आहे.
शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग हा भारताचा पहिला पर्यटन जिल्हा असून, निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि समृद्ध कोकणी वारसा यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र अनेक लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या सध्या या जिल्ह्यातून थांबता न जाता जात असल्यामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटक यांना प्रवासात अडचणी येत आहेत.
त्यामुळे त्यांनी सुचवले की, प्रमुख सण आणि पर्यटन हंगामाच्या काळात प्रायोगिक तत्त्वावर या स्थानकांवर थांबे देऊन प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून द्यावी. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, स्थानिक उत्पादने व हस्तकलेच्या वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल आणि सामान्य जनतेच्या मागण्या पूर्ण होतील.
शरद पवार यांनी ३२ निवडक एक्स्प्रेस गाड्यांचा उल्लेख केला असून, त्या गाड्यांना कुडाळ, कणकवली किंवा सावंतवाडी स्थानकांवर थांबवण्याची विनंती केली आहे.
सिंधुदुर्गमधील सागरी वारशाचे प्रतीक असलेला सिंधुदुर्ग किल्ला हे भव्य ऐतिहासिक स्थळ आहे. मालवणच्या किनाऱ्याजवळ वसलेल्या या किल्ल्याचे बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात केले, जे मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
