महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याची आमची भूमिका :पालकमंत्री उदय सामंत

चिपळूण : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुतीच्या एकजुटीने लढवाव्यात, अशी आमची स्पष्ट भूमिका असून यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी चर्चा सुरू आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी चिपळूणमध्ये पत्रकार परिषदेत केले.

“माझे काल खासदार नारायण राणे यांच्याशी चर्चा झाली. ते भाजप प्रदेशाध्यक्षांशी बोलणार आहेत. मी देखील आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यामुळे समन्वयातून आणि महायुती म्हणून निवडणूक लढणे, हीच आमची इच्छा आहे,” असे सामंत यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला माजी आमदार संजय कदम, सदानंद चव्हाण, शशिकांत चव्हाण आणि राहुल पंडित उपस्थित होते.

संजय राऊत यांच्या प्रकृत्तीविषयी बोलताना सामंत म्हणाले, “ते आमचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत, परंतु आम्ही संस्कार जपणारी माणसं आहोत. त्यांच्या प्रकृत्ती सुधारण्यासाठी आमच्या मनापासून सदिच्छा आहेत.”

विरोधकांनी मतदार याद्यांबाबत घेतलेल्या आक्षेपांवर प्रत्युत्तर देताना सामंत म्हणाले, “निवडणूक आयोगाकडे नाव नोंदणी, वगळणे, दुरुस्ती यासाठी ठरावीक कालावधी असतो. ज्यांनी कधी मतदार यादीच हातात घेतली नाही, त्यांनी त्यावर टीका करणे हास्यास्पद आहे.”

चिपळूण तालुक्यातील साफिस्ट कंपनीतील कामगार प्रश्नाबाबत सामंत म्हणाले, “२४० पैकी ५० कामगारांचे मुद्दे बाकी आहेत. कंपनीचे मालकांशी मी स्वतः बोललो आहे. दोन-चार अडथळे निर्माण करणाऱ्यांमुळे ५० कुटुंबांचे नुकसान होऊ देणार नाही. येत्या दोन-चार दिवसांत निर्णय होईल.”

खडपोली एमआयडीसीतील कोसळलेल्या पुलाबाबत ते म्हणाले, “नवीन पूल बांधण्यासाठी ३५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. पुढील पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. तात्पुरत्या पर्यायी पुलासाठी मिलिटरीची मदत घेण्याबाबतही विचार सुरू आहे.”

कोकणात नोव्हेंबरमध्येही सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान झाल्याची नोंद घेतली असल्याचे सांगताना सामंत म्हणाले, “मी याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. नुकसानीचे पंचनामे करून लवकरच भरपाई देण्यात येईल.”
 

संबंधित लेख