जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा
- by Yogesh Bandagale
- December 30, 2025
- 107 views
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज दिल्या. याविषयी मंत्रालयात आयोजित बैठकीवेळी ते बोलत होते.
बैठकीस महाराष्ट्र मेरीटेम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, मित्रा चे सल्लागार परशराम पाटील यांच्यासह जे एस डब्ल्यू ग्रूपचे प्रतिनिधी उपस्थित होते.
निर्यात प्रक्रिया सुरू करण्यासाठी लागणारी सर्व ती मदत विभाग करेल असे सांगून मंत्री राणे म्हणाले की, कोकणातील उत्पादने लवकरात लवकर आणि सहज निर्यात होण्यासाठी ही प्रक्रिया लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. बंदराला जोडणी होण्यासाठी कोल्हापूर - वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम गतीने हाती घेण्यात येत आहे. उत्पादन तपासणी प्रयोगशाळा १५ जानेवारीपर्यंत सुरू करावी. यंदाच्या हंगामात काजू जयगड बंदरातून निर्यात होण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी तयारी करावी. उत्पादकांमध्ये जागृतीसाठी कार्यशाळेचे आयोजन करावे असेही मंत्री राणे यांनी सांगितले.
