अमित शहा यांना ‘ॲनाकोंडा’ म्हणणारे 'विकृत': खा. नारायण राणे

चिपळूण, ता. २८ (प्रतिनिधी): “उद्धव ठाकरे तोंडाला येईल ते बोलतात. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत. मोदी–शहा यांनी ३७० कलम हटवले. अमित शहा यांना ‘ॲनाकोंडा’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मी ‘विकृत’ म्हणतो,” अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार केला.

ते मंगळवारी चिपळूण येथे झालेल्या जनता दरबारानिमित्त पत्रकारांशी संवाद साधत होते. या वेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजप नेते प्रशांत यादव आदी उपस्थित होते.

संजय राऊतांवरही बोचरी टीका

भाजप कुबड्या म्हणून एखाद्याचा वापर करतो आणि नंतर फेकून देतो, असे विधान करणाऱ्या संजय राऊत यांच्यावरही राणे यांनी हल्ला चढवला. राऊत स्वतःचा अनुभव सांगत आहेत का? आज तेच शिवसेनेचे कुबडी बनले आहेत, अशी चिमटे काढणारी टीका राणे यांनी केली.

जनता दरबारात आले १०५ अर्ज

चिपळूण येथे झालेल्या जनता दरबारात एकूण १०५ अर्ज प्राप्त झाले असून, त्यामध्ये रस्ते व पाझर तलाव विषयक अर्जांची संख्या लक्षणीय आहे, असे राणे म्हणाले. या सर्व अर्जांचा योग्य तो अभ्यास करून संबंधित प्रश्न निकाली काढले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आदित्य ठाकरे यांच्यावरही हल्ला

आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले, “कोण आदित्य ठाकरे? त्याचे विधायक काम काय? पाच पैशाचे काम करत नाही, फक्त बडबड करतो. तरीसुद्धा चॅनलवाले त्याला सतत दाखवतात. ठाकरे पिता-पुत्र तोंडाला येईल ते बोलतात, त्यामुळे त्यांच्या बाबतीत आम्ही जास्त बोलणार नाही.”

स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महायुती

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती होईल, असे राणे म्हणाले. तीन पक्षांची महायुती होऊन आम्ही निवडणूक लढवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

कोकणातील पावसामुळे भातपिकाचे नुकसान

ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस थांबलेला नाही. कोकणातील भात हे मुख्य पीक असून, सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत प्रशासनाला सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वेक्षणानंतर नुकसानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल, असा दिलासा खासदार नारायण राणे यांनी दिला.

संबंधित लेख