केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर बनू शकतो
- by Yogesh Bandagale
- December 14, 2025
- 89 views
तिरुवनंतपुरम : केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) मोठे यश मिळाले आहे. तिरुवनंतपुरम महानगरपालिकेच्या 101 प्रभागांपैकी तब्बल 50 प्रभागांवर NDA ने विजय मिळवला असून, गेल्या 45 वर्षांपासून असलेल्या डाव्या लोकशाही आघाडीच्या (LDF) वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत LDF ला 29 तर काँग्रेस आघाडीला (UDF) 19 प्रभागांवर समाधान मानावे लागले.
महानगरपालिकेच्या (महापौर) एकूण सहा जागांपैकी भाजपला एक जागा मिळाली आहे. भाजपकडून निवडणूक लढवलेल्या माजी IPS अधिकारी आर. श्रीलेखा यांनी सस्थमंगलम विभागातून मोठ्या फरकाने विजय मिळवत लक्ष वेधून घेतले आहे.
आर. श्रीलेखा यांच्या विजयानंतर त्या भाजपकडून महापौरपदाच्या प्रमुख दावेदार ठरतील, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जर त्या महापौर झाल्या, तर केरळमध्ये भाजपच्या पहिल्या महापौर होण्याचा मान त्यांना मिळेल.
शीर्ष पोलीस अधिकारी ते महापौरपदाच्या शर्यतीत
आर. श्रीलेखा यांचे प्रशासकीय करिअर सुमारे 33 वर्षांचे आहे. तिरुवनंतपुरममध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या श्रीलेखा जानेवारी 1987 मध्ये केरळच्या पहिल्या महिला IPS अधिकारी ठरल्या. आपल्या तीन दशकांहून अधिक सेवाकाळात त्यांनी CBI, केरळ क्राईम ब्रांच, दक्षता विभाग, अग्निशमन दल, मोटार वाहन विभाग आणि कारागृह विभाग यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये काम केले.
2017 मध्ये त्यांची पोलीस महासंचालक (DGP) पदावर पदोन्नती झाली आणि त्या केरळच्या पहिल्या महिला DGP ठरल्या. CBI मधील कार्यकाळात त्यांच्या धाडसी छाप्यांमुळे आणि भ्रष्टाचारविरोधी भूमिकेमुळे त्या ‘रेड श्रीलेखा’ या नावाने ओळखल्या जात. डिसेंबर 2020 मध्ये निवृत्तीनंतर चार वर्षांनी, 2024 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा प्रभाव
आर. श्रीलेखा महापौर झाल्यास त्या तिरुवनंतपुरमचे प्रतिनिधित्व करतील, जो काँग्रेस खासदार शशी थरूर यांचा बालेकिल्ला मानला जातो. केरळमधील 1,199 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 9 आणि 11 डिसेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान झाले होते. यात 6 महानगरपालिका, 86 नगरपालिका, 14 जिल्हा परिषद, 152 पंचायत समित्या आणि 941 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
निवडून आलेल्या पंचायत सदस्य, नगरपालिकेचे नगरसेवक आणि महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा शपथविधी 21 डिसेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार शशी थरूर यांनी जनतेच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे, असे सांगत तो निर्णय UDF साठी असो किंवा त्यांच्या मतदारसंघात भाजपच्या विजयासाठी असो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
